Spread the love

अक्कलकुवा / महान कार्य वृत्तसेवा

धडगाव-अक्कलकुवा तालुक्यात आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीतील मित्रपक्षांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात भाजपाचे आमदार विजयकुमार गावित यांनी थेट शिंदे गटाच्या दोन आमदारांवर टीकास्त्र सोडले. सभेत आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमश्या पाडवी यांचा ‘चंद्या’ आणि ‘आमश्या’ असा एकेरी उल्लेख करत हे दोघेही ”टार्गेट” असल्याचे संकेत दिले. या प्रकारामुळे राजकीय वतुर्ळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच आमदार आमश्या पाडवी यांच्या कुटुंबावर विजयकुमार गावित यांनी गंभीर आरोप केला. आमदार आमश्या पाडवी यांची पत्नी आणि मुलगा यांच्या नावावर घरकुल घेतले असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे महायुतीतील वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.

नेमकं काय म्हणाले विजयकुमार गावित?

विजयकुमार गावित म्हणाले की, लढायचं असेल तर समोरासमोर लढा. मागून याच्या त्याच्या तक्रारी करून उपयोग नाही. समोरासमोर लढायला तयार आहे. माझे टार्गेट चंद्या आणि आमश्या आहेत, त्याला खूप मस्ती आलेली आहे. मी दुर्लक्ष करत होतो. पण, रविवारी मुंबईत असताना मी माझ्या पीएला सांगितले की, माहिती काढा लक्षवेधी लावायची आहे. आमश्या पाडवीच्या बायकोच्या नावावर बंगले, घरं असताना त्यांनी घरकुलाचा लाभ घेतला आहे. मुलाने ही घरकुलाचा लाभ घेतला आहे, असे त्यांनी म्हटले होते.

शिवसेनेचा जोरदार पलटवार दरम्यान, शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विजय कुमार गावित यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. परमेश्वरानेच डॉ. विजयकुमार गावित यांची मस्ती जिरवली. डॉ. गावित मंत्री असताना त्यांना मस्ती चढली होती. भारतीय जनता पार्टीला डॉ. गावितांकडून धोका आहे. पक्षाची प्रतिमा मलिन होत होती. त्यामुळे डॉ. गावित यांना मंत्रीपदावरून काढलं. युती करण्यासाठी डॉ. गावित यांनी भान ठेवावे. डॉ. गावित यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे ऐकलं नाही आणि मागच्या काळात काँग्रेससोबत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. जिल्हा परिषदेचा बदला जनतेने लोकसभेत त्यांच्या मुलीचा पराभव करून घेतला. आम्ही नेहमी महायुती म्हणूनच राहिलो आहोत. गावित परिवाराला नंदुरबार जिल्ह्याचा सातबारा पाहिजे. गावित परिवाराने विधानसभेत बंडखोरी करून चारही मतदारसंघांमध्ये त्यांच्या परिवाराचे उमेदवार उभे केले होते, असा हल्लाबोल चंद्रकांत रघुवंशी यांनी केलाय.