श्रीनगर / महान कार्य वृत्तसेवा
जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक शुक्रवारी कुलगाम जिल्ह्यात सुरू झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील अखल जिल्ह्यातील जंगली भागात दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. ही चकमक शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झाली. जम्मू-काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे या भागात शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांकडून कारवाई करण्यात आली.
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडियावर म्हंटले, ”रात्रीभर अधूनमधून आणि तीव्र गोळीबार सुरू होता. सतर्क जवानांनी काळजीपूर्वक प्रत्युत्तर देत भागात घेराव घट्ट करत ठेवला आणि संपर्क कायम ठेवत एका दहशतवाद्याला ठार मारले.”
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात 4 ते 5 दहशतवादी लपलेले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यामुळे अद्याप शोधमोहीम पूर्णत: थांबलेली नाही. अधिक दहशतवादी लपलेले असण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा दलांकडून संपूर्ण परिसरात शोध सुरू आहे.
यापूर्वी 30 जुलै रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला होता. लष्कराच्या जवानांनी दोन सशस्त्र दहशतवाद्यांना ठार मारले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चकमकीत मारले गेलेले हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेचे लष्कर-ए-तैय्यबाचे सदस्य असल्याचे मानले जात आहे. या चकमकीच्या दोन दिवस आधी, सुरक्षा दलांनी श्रीनगरमधील जंगलात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. बुधवारी करण्यात आलेले शिवशक्ती नावाचे ऑपरेशन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या योजनांना मोठा धक्का असल्याचे लष्कराने म्हटले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत आहेत.
