Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्याच्या राजकारणात डोकावल्यास मागील काही दिवसांमध्ये एकच मुद्दा प्रकर्षानं पुढे येताना दिसला. हा मुद्दा म्हणजे राज्यातील शिक्षण व्यवस्थेत चर्चेत असणाऱ्या त्रिभाषा सूत्राचा, त्याहूनही हिंदी सक्तीचा. इयत्ता पहिलीपासूनच्या अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीचा जीआर राज्य शासनानं काढला, ज्यानंतर हिंदीशिवाय इतर भाषांचाही समावेश करणारा शासन निर्णय काढण्यात आला.

प्रत्यक्षात राज्यातील या त्रिभाषा सूत्राला सामान्यांनीही कडाडून विरोध केला आणि अखेर या राजकीय आणि सामाजिक विरोधापुढं नमतं घेत शासनानं हे शासन निर्णय रद्द केले. ज्यानंतर आता नव्यानं राज्य शासनानं  राज्यातील इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर केला आहे.

त्रिभाषा सूत्र रद्द? अभ्यासक्रमात नेमकं काय? समस्त पालक आणि विद्यार्थी वर्गासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असून, राज्य शासनानं नवा अभ्याक्रम जाहीर करत त्रिभाषा सूत्र रद्द केलं आहे. या सुधारित अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजी अशा भाषांचा समावेश असून, तिसरी ते दहावीसाठी तो लागू असेल. राज्यातील शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीनं हा मसुदा तयार करण्यात आला असून, यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण, मूल्यशिक्षण, व्यावसायिक शिक्षण यांचा समावेश आहे. राज्यातील शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षम परिषदेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या मसुद्यातून हिंदी भाषा वगळण्यात आली आहे. ज्यामुळं राज्यात हिंदी सक्ती तूर्तास नाहीच? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.