Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटीत एक असा क्षण घडला की ज्याने संपूर्ण क्रिकेटविश्वाला भारावून टाकलं. भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक आणि दोन वेळचा विश्वविजेता गौतम गंभीर यांनी ऋषभ पंतच्या जिद्दीला सलाम करत स्वत:चा जुना नियम मोडला. हे दाखवणारा भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमधला एका व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ड्रेसिंग रूममध्ये भावनिक भाषण केले.

गंभीरने पंतचे कसे केले कौतुक?

गंभीर नेहमीच म्हणतो की संघ खेळात वैयक्तिक खेळाडूंना विशेष महत्त्व देणं चुकीचं आहे. कोणत्याही सामन्याचं श्रेय एका खेळाडूला देणं त्याला मान्य नाही. पण मँचेस्टर कसोटीत ऋषभ पंतने जे केलं, त्याने गंभीरलाही भावना व्यक्त करायला भाग पाडलं.

तुटलेल्या पायाने मैदानात उतरलेला ‘योद्धा’!

चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतला इंग्लंडच्या क्रिस वोक्सच्या एका चेंडूवर गंभीर दुखापत झाली. चेंडू थेट त्याच्या उजव्या पायाच्या बोटांवर बसला. वेदनेने विव्हळत असलेल्या पंतला बग्गीतून मैदानाबाहेर नेण्यात आलं. स्कॅन रिपोर्टमध्ये त्याच्या बोटाला फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याच्या उर्वरित मालिकेतील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पण दुसऱ्या दिवशी, वेदना असूनही, पंत मैदानात उतरला. मँचेस्टरच्या प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. आणि या योद्ध्‌‍याने मैदानात येत 57 धावांची झुंजार खेळी साकारली.

भाषणात काय म्हणाला गंभीर?

ड्रेसिंग रूममध्ये दिलेल्या भावनिक भाषणात गंभीर म्हणाला, ”या टेस्ट संघाचा पाया तू ठेवला आहेस, ऋषभ. मी आयुष्यभर वैयक्तिक खेळाडूंवर बोलणं टाळलं आहे. पण आज तू जे केलं आहेस, त्याने फक्त या ड्रेसिंग रूमलाच नाही, तर पुढच्या पिढ्यांनाही प्रेरणा मिळेल. हेच तुझं वारसत्त्व आहे. हेच ते योगदान आहे, जे तुला कायम स्मरणात ठेवेल. देश तुला नेहमी अभिमानाने पाहिल आणि पाहत राहील,” असं गंभीर म्हणाला.

ऋषभ पंत पाचवी कसोटी खेळणार की नाही?

दुर्दैवाने, या दुखापतीमुळे ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी नारायण जगदीशनला संघात स्थान देण्यात आलं आहे.

तुटलेल्या पायाने मैदानात उतरून संघासाठी झुंजणारा ऋषभ पंत केवळ खेळाडू न राहता एक प्रेरणास्त्रोत ठरला आहे. गंभीरसारख्या संघाभिमुख प्रशिक्षकाला देखील त्याच्यावर बोलायला लावणारी ही कामगिरी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नोंदली जाणार, याबाबत शंका नाही.