धाराशिव / महान कार्य वृत्तसेवा
तुळजापूर येथील बेपत्ता असलेल्या चित्रा पाटील यांच्या तपासासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. बेपत्ता असणाऱ्या चित्रा पाटील यांचा मृतदेह सोलापूर ते लातुर बायपास रोडवरील नळदुर्ग रोड ब्रिजजवळ सापडला असून त्यांचा गळा दाबून खुन केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, ज्या मुलाला पोटच्या मुलासारखं घरात सांभाळलं, खायला-प्यायला दिलं, त्याच शेजारच्या मुलानं सोनाच्या हट्टा पायी हा खून केल्याचं उघड झाले आहे. अशी माहिती त्यांचे पुत्र संग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुढे आली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीसात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी मारेकरी ओम नितीन निकम या आरोपीला अटक केली असून त्याला पोलीसी खाक्या दाखवताचा त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
अंगावरच्या दागिन्यावर गेला डोळा आणि घात झाला….
पुढे आलेल्या माहितीनुसार, संग्राम पाटील आणि त्यांची आई एकत्र राहत होत्या. तर त्यांच्या आईच्या गळ्यात नेहमी दीड तोळ्याचे गंठण, पाटल्या असे 15 ते 16 तोळे सोने असायचे, त्या नेहमी ते सोने वापरत असत. अशातच शेजारील राहणारा 21 वर्षीय ओम निकम याचा त्या सोन्यावर डोळा होता. तो नेहमी घरी येत-जात असायचा. सोबतच त्याच्या लग्नाची व लग्न ठरल्याची बोलणी करायचा. 18 जुलै रोजी चित्रा पाटील या घरी नव्हत्या त्यावेळी त्यांच्या मुलाने घरी आल्यावर पत्नीस विचारले की, आई कुठे आहे? तेव्हा त्या ओम निकमसोबत फोन आल्यावर कुठेतरी गेल्याचे त्यांनी सांगितले. त्या दिवशी रात्री उशीरा ओम निकम याला अनेक फोन केले. मात्र त्याने आई सोबत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली असता पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासादरम्यान अखेर चित्रा पाटील यांचा मृतदेह सापडलाय. मात्र त्यांच्या अंगावर दागिने नव्हते. त्यामुळे हे दागिने ओम निकम यानेच पळवले असल्याचे हि आता पुढे आले आहे.
सुख-दु:खात ज्याला लेकरासारखं सांभाळलं, त्यानेच केला विश्वासघात
मात्र, चित्रा पाटील यांनी ज्या ओमला स्वत:च्या मुला, लेकरासारखं सांभाळलं, त्याच्या सुख-दु:खात आईसारखी खंबीरपणे आधार दिला त्याच मुलाने त्यांचा विश्वासघात केला. त्याचा गळा दाबून खुन केला व अंगावर असलेले सोन्याचे दागिने लुटले. माणुसकीला काळिमा फसणारे हे कृत्य घडले असून यामुळे ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच घटनेने तुळजापूर परिसरात एकच खळबळ माजली आहे. आईसारखी माया, सुख-दु:खात खंबीरपणे आधार; मात्र अंगावरच्या दागिन्यांमुळे नियत फिरली, ज्येष्ठ महिलेला शेजाऱ्याने संपवलं, तुळजापूर हादरलं!
