Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मराठीच्या मुद्द्‌‍यावरुन मीरा भाईंदर परिसरात मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे वातावरण प्रचंड चिघळले होते. काल रात्रीपासून पोलिसांकडून मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु होती. मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज मिरा भाईंदर परिसरात बालाजी हॉटेल सर्कल, मिरा रोड ते मीरा रोड स्टेशन असा मोर्चा काढण्याचे नियोजन होते. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत कलम 144 लागू केल्याने संतप्त वातावरण पाहायला मिळाले होते. मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते ठरल्यानुसार सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल चौकात जमायला सुरुवात झाले. पोलिसांनी त्यांची धरपकड सुरु केल्यानंतर घटनास्थळी जोरदार राडा पाहायला मिळायला. या सगळ्यानंतर पोलिसांनी अचानक आपली भूमिका बदलत मराठी मोर्चाला परवानगी दिली. मात्र, मोर्चाचा मार्गात थोडासा बदल झाल्याचे समजते.

सध्या बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन या मार्गाने मोर्चा निघाला आहे. या मोर्चामध्ये मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्ते झेंडे घेऊन सहभागी झाले आहेत. मनसेचे नेते अभिजित पानसेही या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा आता शांतीनगर भागाच्या आसपास दाखल झाला आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणावर जैन आणि गुजराती लोकसंख्येचे प्रमाण जास्त झाला आहे. त्यामुळे शांतीनगरच्या वेशीवर स्वामी विवेकानंद रोडवर पोलिसांनी मोर्चा पुन्हा रोखला आहे. त्यामुळे मराठी आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहेत. आम्हाला पुढे सोडणार नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या मांडू, अशी भूमिका मराठी आंदोलकांनी घेतली आहे.