सक्तीच्या हिंदीकरणाची मराठी लेखकाकडून चिरफाड
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात राज्यात संतापाचा उद्रेक झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा हिंदीकरणाविरोधात आवाज उठवल्यानंतर आता कलाकार, मराठी लेखकांडून आवाज उठवण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात तिसऱ्या भाषेची सक्ती नसतानाही सरकारी वरवंटा का आणि कोणासाठी फिरवला जात आहे असा सुद्धा संतप्त सवाल महाराष्ट्रातून उपस्थित होत आहे. दरम्यान, मराठी लेखक अरविंद जगताप यांनी अत्यंत तिखट आणि खोचक शब्दात हिंदीकरणाची चिरफाड केली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून एकप्रकारे राजकीय सत्तेला चपराक दिली आहे. राज्यातील आमदार फोडाफोडीवरूनच त्यांनी उदाहरण देत हिंदीकरणाला कडाडून विरोध केला आहे.
काय म्हटलं आहे अरविंद जगताप यांनी?
अरविंद जगताप यांनी इन्स्टा पोस्ट करून म्हटलं आहे की, पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषमा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना. अरविंद जगताप यांच्या पोस्टला नेटकऱ्यांनी दाद देत कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत पट 50 असेल आणि 20-20 चे दोन गट पडले एक गट हिंदी तर एक गट कन्नड शिकत असेल तर मग उरलेल्या 10 जणांनी कोणती भाषा शिकायची? विचारणा केली आहे. शिक्षणाचा बाजार मांडला मांडल्यानंतर अपेक्षा काय ठेवाव्यात आणि कोणाकडून? अशीही कमेंट एकाने केली आहे.
