Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मध्य रेल्वेमार्गावरील दिवा आणि मुंबा स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये 4 प्रवाशांचा मृ्‌‍त्यू झाला आहे. तर 9 जण जखमी असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेनंतर बराच वेळ मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांसह इतरांना अपघात नेमका कसा झाला आणि किती जणांचा मृत्यू झाला, हे कळाले नव्हते. प्रवासी नेमके लोकल ट्रेनमधून खाली पडले की पुष्पक एक्स्प्रेसमधून खाली पडले, याविषयी संभम होता. तसेच ट्रेनमधून खाली पडलेल्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका रेल्वे स्थानकात पोहोचू शकल्या नव्हत्या. यानंतर मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांना पत्रकार परिषदेत या अपघाताचे खापर अप्रत्यक्षपणे प्रवाशांच्या माथ्यावर फोडले.

हा अपघात झाला तेव्हा अनेक रेल्वे प्रवासी फुटबोर्डवर उभे होते. गाडीत प्रचंड गर्दी होती. एका ट्रेनमधील प्रवाशांच्या बॅगचा दुसऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांना धक्का लागला आणि जवळपास 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. ट्रेनमध्ये भांडण झाल्यामुळे हा प्रकार घडला का, याची माहिती आम्ही घेत असल्याचे सांगत मध्य रेल्वेच्या पीआरओंनी दुर्घटनेचे खापर प्रवाशांवरच फोडले होते. आपल्या पत्रकार परिषदेत लोकल ट्रेन उशीरा येण्यामुळे होणारी गर्दी आणि ढिसाळ नियोजनामुळे कोलमडणाऱ्या वेळापत्रकाबाबत, तसेच मध्य रेल्वेच्या कारभारातील त्रुटींबाबत पीआरओ स्वप्नील निला यांनी चकार शब्दही काढला नाही. तसेच मृतांचा नेमका आकडा सांगण्यातही रेल्वे प्रशासन टाळाटाळ करताना दिसून आले. या पार्श्‌‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले.

मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंबा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मध्य रेल्वेवर दररोज सरासरी सहा ते सात प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही.

केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.